कॉकरोच जनता पार्टी आणि तिची लोकप्रियता: व्यवस्थेबद्दल आणि विद्यमान सरकारबद्दल भारतीय जनतेत वाढणाऱ्या संताप आणि असंतोषाची तसेच पर्यायाच्या अभावाची अभिव्यक्ती
कॉकरोच जनता पार्टीच्या लोकप्रियतेत अचानक झालेल्या वाढीचे मुख्य कारण हे आहे की, आपल्या देशातील सत्ताधारी वर्ग, त्याची राज्ययंत्रणा आणि तिचे विभिन्न अंग-उपांग कष्टकरी जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत प्रचंड असंवेदनशील आहेत. त्यांची वृत्ती बऱ्याच अंशी क्रांतीपूर्व फ्रान्सची राणी मेरी अँटोइनेट हिच्यासारखी झाली आहे; जिने म्हटले होते: “जर लोकांना खायला भाकरी नाही आहे, तर ते केक का खात नाहीत?” त्याचप्रमाणे, भूक आणि कुपोषणाच्या उंबरठ्यावर असलेल्या कष्टकरी वर्गाच्या मोठ्या लोकसंख्येला सांगितले जात आहे की “सब चंगा सी” “मेलोडी खाओ, खुद जान जाओ” किंवा “देश शांतता आणि विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे,” इत्यादी. दुसरीकडे, सधन उच्च-मध्यम आणि उच्च वर्ग पूर्णपणे नशेत धुंद झाला आहे. ही धुंदी आहे ‘उपभोगवादा’ची म्हणजेच अमर्याद ऐषारामाच्या संस्कृतीची; ज्यामध्ये हा वर्ग पूर्णपणे बुडालेला आहे आणि निरंतर “खाओ, पियो, ऐश करो मित्रों” या धुनवर ते अविरतपणे एक उन्मत्त नृत्य करत आहेत. सुईपासून ते विमानापर्यंत सर्व काही निर्माण करणाऱ्या आणि प्रत्येक प्रकारची सेवा उपलब्ध करून देणाऱ्या कष्टकरी वर्गाच्या वेदना आणि दुःखाची त्यांना काहीच पर्वा नाही. उलट ते त्यांची खिल्ली उडवतात. ऐश्वर्य आणि संपत्तीचे हे बीभत्स प्रदर्शन कष्टकरी जनतेच्या संयमाची कसोटी पाहणारे ठरत आहे; ही जनता आज अश्रूंच्या एका विशाल महासागरात बुडालेली आहे.













